दारिद्र्यातून तीन बालकांची विक्री? त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ; आई-वडील पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:43 IST2025-12-10T13:43:19+5:302025-12-10T13:43:37+5:30
Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दारिद्र्याने ग्रासलेल्या एका कुटुंबाकडूनन बालकांच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाके देवगावजवळील बरड्याची वाडी येथील रहिवासी असलेल्या बच्चुबाई हंडोगे या महिलेने आपल्या १२ अपत्यांपैकी तीन मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दारिद्र्यातून तीन बालकांची विक्री? त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ; आई-वडील पोलिसांच्या ताब्यात
त्र्यंबकेश्वर,नाशिक - नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दारिद्र्याने ग्रासलेल्या एका कुटुंबाकडूनन बालकांच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाके देवगावजवळील बरड्याची वाडी येथील रहिवासी असलेल्या बच्चुबाई हंडोगे या महिलेने आपल्या १२ अपत्यांपैकी तीन मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येथील आशा सेविकांच्या संबंधित महिलेच्या घरी देण्यात आलेल्या भेटीतून हा प्रकार उघड झाला आहे.
त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव, बरड्याची वाडी येथील हंडोगे कुटुंब राहते. दोन महिन्यांपूर्वी या महिलेने बाळाला जन्म दिला होता. नियमानुसार बाळाची माहिती घेण्यासाठी जेव्हा आशा सेविका घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना बाळ घरात आढळले नाही. याबद्दल विचारणा केली असता, आई बच्चुबाईने "आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, म्हणून त्याला दुसऱ्याला दिले," असे तिने कर्मचाऱ्यांसमोर सांगितले.
या घटनेनंतर, एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सखोल माहिती घेतली असता, महिलेने यापूर्वीदेखील आणखी दोन मुलांची विक्री केल्याचे किंवा अवैध पद्धतीने हस्तांतरण केल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे आता या संपूर्ण घटने प्रकरणी पोलिसांनी संशयित आई आणि वडील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
"विक्री नाही, दत्तक दिले" : आईचा दावा.
गंभीर आरोपानंतर आई बच्चुबाई हंडोगे यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत "आम्ही मुलांची विक्री केलेली नाही,आमची परिस्थिती हालाखीची असल्याने आम्ही आमच्याच नातेवाईकांकडे मुलांना दत्तक दिले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. बच्चुबाई यांनी एकूण १२ अपत्ये असल्याची माहिती दिली, त्यापैकी तीन मुले दत्तक दिली आहेत, तीन मुलींची लग्ने झाली असून पाच मुले त्यांच्याजवळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापनपोलीस चौकशी सुरू
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलली आहेत. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या आरोपांची गंभीर दखल घेत, काल रात्री उशिरा आई-वडील बच्चुबाई हंडोगे आणि त्यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आदिवासी भागातील गरिबी आणि बालकांच्या हक्काचे उल्लंघन करणाऱ्या या घटनेतून सत्य बाहेर काढणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.पोलीस तपास आणि समितीचा अहवाल आल्यानंतरच "विक्री की दत्तक" यातील नेमके सत्य समोर येईल.
त्यामुळे पोलिस तपासात नेमके काय समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.