"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:59 IST2023-07-21T16:20:22+5:302023-07-21T16:59:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप
मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये आक्रमक झाले आहेत. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढत याप्रकरणी उत्तर मागवले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. "सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल", अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला आहे.
...तर आम्हीच अॅक्शन घेऊ - सर्वोच्च न्यायालय
मणिपूरमधील घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत तीव्र शब्दात भाष्य केले आहे. "हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अॅक्शन घेऊ, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आतापर्यंत काय अॅक्शन घेतली, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तरही सर्वोच्च न्यायालयाने मागितले आहे.
काय घडलं मणिपूरमध्ये?
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.