संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:04 IST2025-10-13T13:04:16+5:302025-10-13T13:04:32+5:30
शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्रकाडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला
मंडणगड (जि. रत्नागिरी) : लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेल्या न्याय, शासन व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाच्या मार्गावर कार्यरत आहे. शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्रकाडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.
मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे उपस्थित होते.
आंबडवे गावाचा विकास आराखडा तयार : मुख्यमंत्री
मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक बनविण्यासाठी राज्य सरकार जातीने लक्ष देणार आहे.
आंबडवे गावाचा विकास आरखडा तयार झाला असून, त्यानुसार या गावाचा विकास राज्यशासन करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.