"...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या’’, काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:07 IST2025-03-29T16:06:22+5:302025-03-29T16:07:05+5:30
Harshwardhan Sapkal News: भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास सुरू आहे. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हासनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.

"...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या’’, काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई - भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास सुरू आहे. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हासनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढला पण मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे, लघू, छोटे व मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला. उल्हासनगर सारख्या शहरातील या उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ यांनी सांगितले.