“नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...”; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:18 IST2023-08-29T14:16:29+5:302023-08-29T14:18:15+5:30

Sanjay Raut News: कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

thackeray group sanjay raut reaction over cag report on nitin gadkari department | “नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...”; संजय राऊतांचा दावा

“नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: केंद्र सरकारच्या विविध सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी उघड केले आहे. त्यापैकी दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढल्याचे उघड झाले. कॅगचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेटाळला. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यासंदर्भात काँग्रेसचे विधानसभचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना मोठा दावा केला आहे. 

कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे. नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचे राजकारण संपवायचे हेही एक कारण असू शकते, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. 

नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...

कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्याकडे त्याबाबत माहिती नाही. पण नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेले कामच सध्या दिसत आहे. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसे संपवायचे? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नितीन गडकरी यांनी काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. ‘कॅग’च्या शंकांचे वेळीच निराकरण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही दिले आहेत. भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ९१,००० कोटी खर्चून एक्स्प्रेस वे तयार करण्याच्या प्रस्तावाला १० ऑगस्ट २०१६ रोजी मंजुरी दिली होती. नंतर त्याच्या बांधकाम खर्चात लक्षणीय वाढ झाली.

 

Web Title: thackeray group sanjay raut reaction over cag report on nitin gadkari department