“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:31 IST2025-07-25T13:28:07+5:302025-07-25T13:31:44+5:30
Sanjay Raut News: मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण असून, नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते, असा दावा संजय राऊतांनी केला.

“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
Sanjay Raut News: झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलीटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकाने रांचीमध्ये अटक केली आहे. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियांच्या चौकशीतून अमित साळुंखेवर एसीबीने अटकेची कारवाई केली आहे. याच अमित साळुंखेचा उल्लेख करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या साफ-सफाईची मोहीम हाती घ्यावीच लागेल. चार मंत्र्यांची नावे घेत संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले परंतु त्यांचा मुख्य हेतू हा मंत्रिमंडळात जे गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ते दिल्लीत आले. मंत्रिमंडळातील ४ मंत्री जाणार आहेत, हे मी काही दिवसांपासून सांगत आहे. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल. संपूर्ण मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. हे ओझे देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे शिंदेकडे वळवले
१०० कोटींचे रुग्णवाहिका निविदा ८०० कोटींपर्यंत गेली, त्या १०८ नंबर रुग्णवाहिकेचे कंत्राट सुमित फॅसिलिटीला दिले होते. त्याचे सूत्रधार अमित साळुंखे आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे शिंदेकडे वळवले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला दिले याची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. झारखंडमधील मद्य घोटाळ्यात अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत ते शोधायचे आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले जात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, झारखंडमधून पथक येते आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाणार आहे. ८०० कोटींचा घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकलेत. कुठल्या मेडिकल फाऊंडेशनला हे पैसे गेलेत. निवडणुकीत कसे वापरले गेले. कुठून आले हे सगळे आता बाहेर पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम घ्यावी लागेल. मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे आणि कुणाला काढायचे, वगळायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाह यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळाचा पूर्ण चेहरा बदलून नव्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणावे अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्तुळात सुरू आहे. खरेतर ज्यांचे १३७ आमदारांचे संख्याबळ आहे त्यांना अशाप्रकारच्या ओझ्याने वाकून जायची गरज नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.