“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:30 IST2025-05-03T11:28:49+5:302025-05-03T11:30:16+5:30
Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
Sanjay Raut News: काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडले, तसेच गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवले आहे, असा सवाल करत, २७ जणांचे हत्याकांड झाले, त्यात राज्यातील ६ माणसे आहेत. अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. अमित शाह चुन चुन के मारेंगे म्हणाले. मग मारा ना. कोणी अडवले? आमच्याच लोकांना चुन चुन के मारले आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्या देशाला पाकिस्तान आणि चीनसारखा शेजार लाभला आहे, त्या देशात सतत युद्धसराव सुरूच असतो. पण सध्या सरकारचे वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जात आहेत, असे वाटत नाही. मोदींनी अद्याप युद्ध सुरू केले नाही. त्यांची मानसिकता पाहावी लागेल, अशी टीका करतानाच, यु्द्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. घाबरून नेते आणि दहशतवादी पाकिस्तान सोडून पळाले आहेत, पण हे सर्व मीडियात सुरू आहे. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसत नाही
साधा एक अमुक तमूक मेला तरी राष्ट्रीय शोक पाळला जातो, सरकारी कार्यक्रम रद्द केला जातो. पण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार दौऱ्यावर गेले. दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या कार्यक्रमात जातात. कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर दिसत नाही. मोदींच्याही चेहऱ्यावर दुःख दिसले नाही. भाजपाच्या किंवा प्रमुख लोकांच्या दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही. ज्या देशात युद्धाची तयारी असते त्या देशातील पंतप्रधान राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही. काश्मिरात एवढे मोठे हत्याकांड झाले, पण त्यानंतर आमचे पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणाले. देशात युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. गौतम अदानी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. आणखी एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, विरोधकांनी अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. विरोधकांची कीव वाटते. विरोधकांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा आणि मग समर्थन द्यावे. हे सरकार नाहीत, हे नराधम आहेत. विरोधकांनी त्यांच्या चुकांना पाठिंबा देऊ नये, असे संजय राऊतांनी सांगितले.