५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:39 IST2025-06-21T12:38:24+5:302025-06-21T12:39:34+5:30

खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे.

TDCC Bank farmers meet for distribution of crop loans worth Rs 573 crore | ५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयाेजित केले जात आहेत. बँकेच्या सर्व शाखांसह प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्तरावर आयोजित शेतकरी मेळाव्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शेती कर्ज वाटप मुख्यतः बँकेमार्फत करण्यात येते. एसएलबीसीच्या सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक पत आराखड्यानुसार एकूण खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे ठाणे जिल्ह्यासाठी ४०४ कोटी ६८ लाख रुपये व पालघर जिल्ह्यासाठी २१६ काेटी २५ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी टीडीसीसी बँकेस ठाणे जिल्ह्यासाठी ४६ टक्के म्हणजेच १८७ कोटी २८ लाख तर पालघर जिल्ह्यासाठी ४५ टक्के म्हणजे ९८ कोटी ६४ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. 

खरीप हंगाम २०२५-२६ साठी...
यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने दोन्ही जिल्ह्यांत शेतकरी मेळावे आयोजित केले, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यासाठी बँकेने खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी  २९१ कोटी ३३ लाख रुपये व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८१ कोटी ९५ लाख अशी एकूण  ५७३ काेटी २८ लाख रुपये पीक कर्ज वाटपासाठी मंजुरी दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या मंजूर पीक कर्जापैकी १८ जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७९ कोटी ७१ लाख व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  ७० कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, असेही पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अनुसरून ठाणे, पालघर जिल्ह्यातील सहकार विभागाचे अधिकारी, बँकेचे अधिकारी, शाखा तपासणीस, सहाय्यक तपासणीस यांची अलीकडेच सभा घेऊन खरीप हंगाम ‘२०२५-२६ खरीप पीक कर्ज’ वाटप नियोजन व आढावा घेण्यात आला. बँकेच्या सर्व शाखा, प्राथमिक कृषि सहकारी संस्था पातळीवर शेतकऱ्यांच्या सभा आयोजित करून त्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप करून शासनाचे दिलेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी निश्चित केले, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

Web Title: TDCC Bank farmers meet for distribution of crop loans worth Rs 573 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.