'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:03 IST2025-01-24T13:58:28+5:302025-01-24T14:03:49+5:30
ST Ticket Price Hike News: राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. यामागील कारणांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे.

'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण?
ST Bus Fare hike: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी वाढ करण्यात आली असून, शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासून लागू होणार आहे. पण, इतकी मोठी भाडेवाड राज्य सरकारला का करावी लागली, याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "काल (२३ जानेवारी) प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, एसटीची भाडेवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ती १४.९७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे."
'प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित, पण...', सरनाईकांनी दिली माहिती
"रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत. प्रत्येक वर्षी खरंतर ही भाडेवाढ अपेक्षित असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून ही करण्यात आलेली नसल्या कारणाने ही एकत्रित १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ती आजपासून लागू होईल", अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
"एसटी महामंडळाची परिस्थिती आज काही चांगली नाहीये. एसटीचे उत्पन्न आहे, त्यापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला होतं. त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना सुविधा द्यायच्या असतील, तर या गोष्टीची गरज असणार आहे. कारण दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी आणि बसची दुरूस्तीचा खर्च वाढू लागला आहे", असेही सरनाईक म्हणाले.
मी बैठकीत दरवर्षी भाडेवाढीचं सूचना केली होती -सरनाईक
'मी जेव्हा परिवहन खात्याची बैठक घेतली. त्यावेळी हेच सूचवलं होतं की, एकत्रितपणे भाडेवाढ करण्याऐवजी जर दरवर्षाला ठराविक भाडेवाढ केली, तर सर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही. प्रवाशांनाही ते अपेक्षित असेल. आता केलेल्या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचं जे दररोज नुकसान होतं आहे, ते कमी होईल", अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.