...म्हणून मी अर्धा दिवस पुढे असतो! दिवसा नव्हे, तर पहाटे सव्वापाचच्या मुलाखतीत जेव्हा अजित दादा गौप्यस्फोट करतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:25 IST2026-01-29T10:25:11+5:302026-01-29T10:25:59+5:30
Ajit Pawar Death News: पहाटेच्या मुलाखतीचा हा असा पहिलाच अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहाणारा ठरला. तोपर्यंत २९ वर्षांच्या पत्रकारितेत अनेक मान्यवरांच्या मुलाखती, अगदी रात्री-अपरात्रीच्या घटना-घडामोडी कव्हर केल्या असल्या, तरी एखादा मोठा नेता असा भल्या पहाटे मुलाखतीसाठी वेळ देईल ही कल्पनाच कधी केली नव्हती.

...म्हणून मी अर्धा दिवस पुढे असतो! दिवसा नव्हे, तर पहाटे सव्वापाचच्या मुलाखतीत जेव्हा अजित दादा गौप्यस्फोट करतात...
- अभिजीत कुलकर्णी
नाशिक : “ हॅलो... अजितदादांनी आपल्याला मुलाखतीसाठी उद्या सव्वा पाचची वेळ दिली आहे. वेळेपूर्वी दहा मिनिटे उपस्थित राहावे.” “ठीक आहे. सकाळी निघतो नाशिकहून, म्हणजे दुपारपर्यंत बारामतीला पोहोचेन.” “अहो, संध्याकाळी नव्हे, पहाटे सव्वा पाचची वेळ आहे मुलाखतीची, व्यवस्थित लक्षात घ्या...”
पहाटेच्या मुलाखतीचा हा असा पहिलाच अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहाणारा ठरला. तोपर्यंत २९ वर्षांच्या पत्रकारितेत अनेक मान्यवरांच्या मुलाखती, अगदी रात्री-अपरात्रीच्या घटना-घडामोडी कव्हर केल्या असल्या, तरी एखादा मोठा नेता असा भल्या पहाटे मुलाखतीसाठी वेळ देईल ही कल्पनाच कधी केली नव्हती. पण अजितदादांच्या राजकारणाचा बाजही त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच अगदी वेगळा असल्याचा प्रत्यय त्या गप्पांतून आला.
“दादा, तुमचा दिवस किती लवकर सुरू झालाय ते तर पाहातोच आहे, पण कालचा दिवस कधी संपला?” या प्रश्नाने मुलाखतीची सुरुवात झाल्यावर अगदी सहजपणे त्यांनी रात्री अडीच, पावणे तीनला घरी आल्याचे सांगितले. तोच धागा पकडत, “आमच्या राजकारणातल्या मित्रांची सकाळ जेव्हा सुरू होते, तेव्हा माझे अर्ध्या दिवसाचे काम संपलेले असते. त्यामुळे मी दररोज त्यांच्या अर्धा दिवस पुढे असतो आणि हेच माझ्या आजवरच्या यशाचे कारण आहे,” असे दादांनी आपल्या खास शैलीत स्पष्टपणे सांगितले होते.
“सध्याचे राजकारण खूप बदलले आहे. निवांत राहून चालणार नाही, हेच मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो. पण, आमची मंडळी सगळा घोळच घालत बसतात. ना कुठे कार्यक्रमाला वेळेत जातात, ना कुठला निर्णय वेळेवर घेतात आणि म्हणून मग लोकं राजकारण्यांच्या नावे ठणाणा करतात… हल्ली मला सगळे म्हणतात, ‘दादा एवढं स्पष्ट बोलू नका, लोकांना दुखावू नका...’ अरे, पण मला कळतंच नाही हे आमच्या लोकांचं... जर आपण कुठे मागे राहातोय, कुठे चुकतोय ते सांगितलं नाही, त्याबद्दल बोललं नाही तर परिस्थिती सुधारणार कशी?”
...ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतल्या मुलाखतीत सुद्धा स्वभावधर्मानुसार दादा कदाचित ‘पोलिटिकली करेक्ट’ राहू शकत नसतील, पण माणूस म्हणून मात्र ते किती ‘करेक्ट’ होते, ते यानिमित्ताने जाणवल्याशिवाय राहिले नाही.