कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याप्रकरणी एसआयटी स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:25 IST2018-08-16T15:08:15+5:302018-08-16T15:25:22+5:30
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे.

कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याप्रकरणी एसआयटी स्थापन
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सर्व्हर सारखा प्रॉक्सी स्वीच बनवून त्याद्वारे हॅकरने हल्ला चढवत व्हिसा व रूपे डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची लुटण्यात आले होते. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एकत्रित विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे़ या पथकात पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ञांचा समावेश असणार आहे. दरम्यान, कोल्हापूरातून काही पैसे काढण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक कोल्हापुरात रवाना झाले आहे़.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून चोरटयांनी कोट्यावधी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, ६ पोलीस कर्मचारी तसेच सायबर गुन्हे विषयक तज्ञांचा समावेश राहणार आहे़
याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांकडून काही तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सायबर हल्ला करणाऱ्या चोरट्याने बँकेच्या खात्यातील रक्कम हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली आहे. तसेच परदेश आणि देशातील काही खात्यातून काही रक्कम काढण्यात आली आहे.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. कोल्हापुरातून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे़.