मुंबई: शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीलासोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सतत टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणेंचा शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर नारायण राणे हे महाराष्ट्राला किळसवाणी व्यक्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले की, नारायण राणेंच्या वक्तव्याला सद्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. तर राणे यांचं राजकीय क्षेत्रातील महत्व संपले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान नसल्याने त्यांना कुणीही मानत नाही. कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.
तसेच, मी खूप अभ्यासू,विचारवंत व मोठा वक्ता असल्याचे त्यांना वाटत असले तरीही चार वाक्य तरी राणेंना दिल्लीत बोलता येते का ? असा प्रश्न सुद्धा जाधवांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे दिल्ली आणि राज्याच्या राजकारणात राणेंना कोणतेही महत्व उरलेले नाही. आपली कुणीतरी दखल घ्यावी म्हणून त्यांची सतत बडबड सुरु असते. स्वता:च्या मुलाला निवडून आणण्याची पात्रता त्यांची राहिली नाही, त्यामुळे राणेंनी इतरांवर टीका करू नयेत, असा खोचक टोला सुद्धा आमदार जाधव यांनी राणेंना लगावला.
तर स्वता:चं अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा राणेंचा केविलवाणी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे हे किळसवाणी व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला वाटायला लागले आहेत. त्याचप्रमाणे नारायण राणेंचा पायगुण असा आहे की, ज्या पक्षात ते जातात त्याच्या पराभवचं होत असतो. त्यामुळे भाजपला सुद्धा आपला मुख्यमंत्री करता आले नाही. शिवसेना सोडताना जे आमदार राणेंनी सोबत नेले होते, त्यातील एकाला सुद्धा त्यांना निवडून आणता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी जाधव यांनी केला.