Bhaskar Jadhav : "रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार", भास्कर जाधवांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:04 IST2022-07-20T15:57:50+5:302022-07-20T16:04:28+5:30
Shivsena Bhaskar Jadhav Slams Ramdas Kadam : शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता.

Bhaskar Jadhav : "रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार", भास्कर जाधवांचा इशारा
गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झालं. कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. याच दरम्यान भास्कर जाधव य़ांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"रामदास कदम (Ramdas Kadam) य़ांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार" असा इशारा भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी दिला आहे. शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता. त्यावर "याबाबत सविस्तर मी एकदा बोलणार आहेत. परंतू आज मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे, सगळी परिस्थिती मी पूर्णपणे नजरेखालून घालतोय. कोण कोण कशाबाबतीत यासंदर्भात आपापली मतं मांडतोय हे मी बघतोय. रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते योग्यवेळी मी देणार आहे" असं म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला" असं म्हटलं आहे.
"उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पाहा... कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले... मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो... प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे" असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.