“नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य मिळो, देशाची सेवा घडत राहो”; संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 14:01 IST2023-09-17T13:59:28+5:302023-09-17T14:01:16+5:30
Sanjay Raut On PM Narendra Modi Birthday: नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केले आहे. हे मान्य केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

“नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य मिळो, देशाची सेवा घडत राहो”; संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा
Sanjay Raut On PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. देशभरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
देशासमोर अनेक समस्या आहेत. मणिपूरपासून बेरोजगारी आणि महागाईपर्यंत अशा अनेक समस्यांना देशासमोर आहेत. त्यांना पुढच्या वर्षापर्यंत या समस्यांना तोंड द्यावे लागेल. जोपर्यंत ते सत्तेत आहे. तोपर्यंत त्यांना अशा समस्यांशी संघर्ष करण्याचे बळ मिळो. याच सदिच्छा, असे संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य मिळो, देशाची सेवा घडत राहो
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले. आमच्यात कितीही मतभेद असो. पण नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो. त्यांच्या हातून देशाची सेवा घडत राहो. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केले आहे. हे मान्य केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नावाने योजना सुरू करत आहेत. जर २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीतून होत असेल तर ते चुकीचे आहे. ते आपले कर्तव्य आहे. तुम्ही अशा किती योजनाला कुठल्या नेत्याची नावे दिली, तरी मते मिळत नाहीत. देशावर अनेक समस्या आहेत. अनेक संकटे आहेत. जर देशाचा विचार केला तर आजही देशातील जनता अस्वस्त व अस्थिर आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. चाकरमानी कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. ट्रेन आणि बसला प्रचंड गर्दी आहे. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. यावर बोलताना, मी स्वतः चिंतेत आहे. मला कोकणात गावाला जायचे आहे. मी आणि बंधू आमदार सुनील राऊत हे विचार करत आहोत की, गावाला कसे जायचे. आमच्या घरातील काही लोक गावाला पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही कसे पोहोचलो हे आम्हालाच माहिती आहे. कारण रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे जेव्हा अडीच वर्षे आमचे सरकार सत्तेत होते. तेव्हा हेच लोक मुंबई गोवा हायवे रस्त्यावरून टीका करत होते. आज तुम्ही काय करताय? तुमच्या सरकारलाही एक वर्ष झाले ना… तुम्हीही हा रस्ता नीट करू शकला नाहीत. तुम्ही राज्याचा काय विकास करणार आहात, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.