'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:40 IST2025-06-07T16:38:52+5:302025-06-07T16:40:37+5:30
राज्यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात महायुतीत त्यावरून अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसत आहे.

'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. पण, त्यावरून नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. तेव्हापासून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. रायगड जिल्ह्यात तर यावरून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी दावा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेना नेत्यांनी खदखद व्यक्त केली. ही नियुक्ती रद्द करण्यात आली. तेव्हापासून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील आमदार नेते यांच्या सुप्त संघर्ष सुरू आहे.
पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही
शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री होत्या. आता अदिती तटकरेंबरोबरच भरत गोगावले हेही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ते सातत्याने पालकमंत्रिपदावर दावा करत आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे इतर आमदारही भरत गोगावलेंसाठी आग्रही आहेत.
शिवसेनेलाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे
दरम्यान, शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटताना दिसत नाही. तुमचे सहकारी थोरवे म्हणताहेत की, राष्ट्रवादी पुढे झुकणार नाही, असे योगेश कदम यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "रायगडचं पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांनाच मिळालं पाहिजे. शिवसेनेलाच मिळालं पाहिजे."