“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:22 IST2025-06-23T18:22:48+5:302025-06-23T18:22:48+5:30
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका करण्यात आली आहे.

“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोकणातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे.
एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही येऊ नका, असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त १२०० मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. ते मीडियाशी बोलत होते.
नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही
भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
दरम्यान, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.