“मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:04 IST2025-01-26T21:03:58+5:302025-01-26T21:04:35+5:30

Uday Samant Reaction On Manoj Jarange Patil Agitation For Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

shiv sena shinde group minister uday samant said manoj jarange patil needs to communicate with the govt | “मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

“मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

Uday Samant Reaction On Manoj Jarange Patil Agitation For Maratha Reservation: बीड प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले आणि सातत्याने महायुती सरकारला इशारा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे वळवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २५ जानेवारी २०२५ पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे हे सातवे उपोषण आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

उदय सामंत म्हणाले की, प्रामाणिकपणाने जनतेचा कौल तुम्ही सांगा की, मराठवाड्यात निजामकालीन नोंदी ज्या मिळालेल्या आहेत, त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला नक्की मिळत आहे. नारायण राणे यांनी कोकणात विधान केले आहे. प्रत्येक विभागीय प्रांताचे दाखल्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. आमच्या कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरातील मराठा समाजाने सांगितले की, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. कारण ज्या कुणबी समाजाला ते प्रमाणपत्र मिळत आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत. तुम्ही विदर्भात गेलात, तर विदर्भात ९८ ते ९९ टक्के हे दाखले मिळत आहेत. हा आठ जिल्ह्यांचा प्रश्न आहे. 

१० टक्के शाश्वत आरक्षण मराठा समाजाला दिले

आठ जिल्ह्यांना न्याय देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी मागच्या वेळी कसोशीने केला आहे. १० टक्के शाश्वत आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही मराठा समाजाला द्यावे लागेल, ओबीसी समाजाचे न हिरावून घेता, ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले आहे किंवा जो न्याय दिला आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतली. ते आरक्षण अजून टिकलेले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना विनंती करायची आहे की, संवाद साधण्याचा निर्णय कधीतरी झाला पाहिजे. सरकारशी त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्यांचे जे काही गैरसमज असतील, तर ते आम्ही दूर करू. आमचे गैरसमज ते दूर करतील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत. त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानाच्या चौकटीत बसवून त्यांच्या किंवा कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. माझा या जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, असे भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नमूद केले. तसेच भाजपा खासदार आणि मराठवाड्यातील मराठा नेते अशोक चव्हाण यांनीही लवकरच उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

 

Web Title: shiv sena shinde group minister uday samant said manoj jarange patil needs to communicate with the govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.