“कोकण १०० टक्के रिकामे होणार, ठाकरे गटाचे कोणीच राहणार नाही”; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 19:48 IST2025-02-09T19:46:42+5:302025-02-09T19:48:55+5:30
Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: ऑपरेशन टायगर आता मार्गी लागले आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटातील नेत्याने मोठा दावा केला आहे.

“कोकण १०० टक्के रिकामे होणार, ठाकरे गटाचे कोणीच राहणार नाही”; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. अगदी अलीकडेच परभणी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता कोकणचा नंबर असल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून, ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागत असलेली गळती उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे सांगितले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी कोकण १०० टक्के रिकामे होणार असल्याचा दावा केला आहे.
कोकण १०० टक्के रिकामे होणार, ठाकरे गटाचे कोणीच राहणार नाही
मीडियाशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ठाकरे गट आता कोकणात नावालाही राहणार नाही. पूर्ण कोकण १०० टक्के रिकामे होणार आहे. ऑपरेशन टायगर आता मार्गी लागले आहे. अनेक जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेत लोक येत आहे. नांदेडमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला. शिवसेना कोणाची हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडे आहे. सगळीकडे महाराष्ट्र मध्ये हे चित्र असणार आहे, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार करणार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच राजन साळवी १३ फेब्रुवारीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. परंतु, यावरून सामंत बंधू नाराज असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे सोबत माझी चर्चा झालेली नाही. आम्ही त्यावर सविस्तर चर्चा करू. ते पक्षात येत असतील तर त्यांच्या काय इच्छा आहेत? काय आकांक्षा आहे? त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहे. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली.