भाजपा नाच्या पोरांसारखा ‘त्या’ बाईच्या इशाऱ्यावर नाचतो; शिवसेनेचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 07:06 IST2022-04-25T07:05:57+5:302022-04-25T07:06:43+5:30
राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी व अफरातफरीचे आहेत असं शिवसेनेने म्हटलं.

भाजपा नाच्या पोरांसारखा ‘त्या’ बाईच्या इशाऱ्यावर नाचतो; शिवसेनेचा घणाघात
मुंबई - अमरावतीचे राणा दाम्पत्य हे अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील त्याचा भरवसा नाही. श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईंचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर घणाघात केला आहे.
राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी व अफरातफरीचे आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळय़ातील आरोपी किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेले तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्यावर चपला व दगड फेकले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर, लफंग्यांचे समर्थन करीत आहेत. खरा विनोद पुढेच आहे. आयएनएस विक्रांतप्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राने विशेष सुरक्षा कवच दिले आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणांसाठीदेखील केंद्राने अलगद सुरक्षा कवच दिले आहे. ‘ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला व केंद्राची सुरक्षा मिळवा’, अशी ‘ऑफर’ बाजारात आलेली दिसते. अशाने कायद्याचे राज्य कोसळून पडेल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनता पक्षाने सध्या हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा एक संस्कार आणि संस्कृती आहे, धिंगाणा नाही.
मुंबईत येऊन ‘मातोश्री’समोर ‘हनुमान चालिसा’ वाचू असे या राणा दाम्पत्याचे म्हणणे होते. खरे म्हणजे ‘हनुमान चालिसा’चा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर करायचाच होता तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान मोदींचे निवासस्थान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे दालन अशा ठिकाणी या दाम्पत्याने पठण करायला हवे.
महाराष्ट्रात हिंदुत्व जोरात आहे. कारण उद्धव ठाकरे हेच राज्याचे नेतृत्व करीत आहेत. दुसरे असे की, ‘हनुमान चालिसा’वर राज्यात कोणी बंदी घातलेली नाही. तरीही ‘मातोश्री’वर जाऊन ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भारतीय जनता पक्षाचेच कुजके डोके आहे.
राणा दाम्पत्यास पुढे करून मुंबईत वातावरण बिघडवायचे हेच ठरवले होते व त्याबरहुकूम सगळे घडले. अर्थात शिवसैनिक चवताळून उठले व राणा दाम्पत्याला घराबाहेर पडणे कठीण झाले. आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे.
श्रीमती राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे अमरावती लोकसभेची निवडणूक लढवली व जिंकली. नवनीत कौर राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. अमरावती लोकसभा हा राखीव मतदारसंघ आहे. निवडणूक लढविण्यासाठी नवनीत कौर राणा यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार केले. खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र मिळवले. या फसवणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन वेळकाढूपणा चालवला आहे.
नवनीत कौर राणा या संसदेत खोटय़ा जात प्रमाणपत्रावर पोहोचल्या व आज त्या कायदा, नीतिमत्ता वगैरेवर लोकांना शहाणपणाचे डोस पाजत आहेत. भाजपचे लोक या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करतात. राम सत्यवचनी होता. हनुमान त्या सत्यवचनी रामाचा भक्त होता. खोटेपणाच्या पायावर उभ्या असलेल्या नवनीत राणा ‘हनुमान चालिसा’चे राजकारण करतात व समस्त भाजप या भंपकपणाच्या नौटंकीत टाळय़ा वाजवत नाचत आहे. हे कसले सत्यवचन?
राणांच्या खोटय़ा जात प्रमाणपत्राविरुद्ध मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सविस्तर अहवाल पाठवला. त्यामुळे राणा दांपत्याने मुंबई पोलिसांविरुद्ध थयथयाट करणे स्वाभाविक आहे. अशा बोगस, बनावट राणांच्या खांद्यावर भोंगे लावून भाजप ‘हनुमान चालिसा’चे पठण करीत असेल तर तो श्रीरामाचा व रामभक्त हनुमानाचा अपमानच आहे.
भाजपचे ढोंग यानिमित्ताने उघडेच नव्हे, तर नागडे झाले आहे. हिंदुत्व, श्रीरामाला जाहीरपणे विरोध करणारे हे दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘धर्मनिरपेक्ष’ पाठिंब्याने निवडून आले व आता भाजपच्या कळपात शिरले. अशा शेळय़ा-मेंढय़ांच्या मदतीने भाजपला शिवसेनेवर हल्ले करायचे आहेत.
राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. जणू काही राणी चेन्नम्मा, झाशीच्या राणीवरच कारवाई झाली अशा आविर्भावात हे सगळे लोक पोलीस ठाण्यात धावले व पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून छाती पिटू लागले. काँग्रेसमध्ये असताना ‘ईडी’च्या भयाने जे शेपटय़ा आत घालून भाजपचे गुलाम झाले असे लोक शिवसेनेला आव्हान देत आहेत.