विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:10 IST2026-04-05T10:08:40+5:302026-04-05T10:10:43+5:30
राज्यसभेची परतफेड विधानपरिषदेत करणार

विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी भूमिका राष्ट्रवादीने शरद पवार गट भेटण्याच्या वृत्तानंतर काँग्रेसने मात्र या विषयावर अद्याप कोणतीही चर्चा मविआमध्ये झालेली नाही, असे म्हणत अंतर राखले आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यात भाजपच्या वाट्याला पाच, शिंदेसेनेला दोन, तर राष्ट्रवादीला (अजित पवार गट) एक जागा मिळेल आणि उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाईल, असे चित्र आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला असल्याने ते पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर सूत्रांनी सांगितले की उद्धव ठाकरे येथील त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी ‘मविआ’तील सर्वच घटकांनी पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार स्वीकारावा अशी भूमिका शरद पवार गटाकडून घेतली जाऊ शकते.
गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या वाट्याची एकमेव जागा ही उद्धवसेनेला मिळावी, यासाठी त्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र, याच पक्षाचे नेते खा. संजय राऊत हे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. उद्धवसेनेचे विधानसभेत २०, काँग्रेसचे १६, तर शरद पवार गटाचे १० आमदार आहेत.
आम्ही नेहमी पाठिंब्याचीच भूमिका घ्यायची का?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विधानपरिषदेची एक जागा ‘मविआ’तील कोणत्या घटक पक्षाला मिळावी, यावर आधी चर्चा झाली पाहिजे. राज्यसभेवेळी आम्ही शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेवर जावे असे काँग्रेसने सुचविले असताना आमच्या दिल्लीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळविला गेला होता. आमच्या पक्षाचे १६ आमदार आहेत. आमचा पक्ष मविआमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही आमच्याकडूनच पाठिंबा देण्याची अपेक्षा ठेवली जाते. दरवेळी केवळ आम्ही पाठिंब्याचीच भूमिका घ्यायची का? असा सवाल सकपाळ यांनी केला.