"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:58 IST2025-09-26T17:57:26+5:302025-09-26T17:58:32+5:30
पूरग्रस्त भागात मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून अनेक जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारने बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकम न लावता सर्वोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही शेतकऱ्यांच्या बांधांवर मदतीचे आश्वासन घेऊन पोहोचले आहेत. अशातच शरद पवार यांनीही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे म्हणत त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल असं म्हटलं आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हे पंचनामे करताना सरकारी यंत्रणेचे मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे दुर्लक्ष होत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी एक्स पोस्टवरुन लातूर भूकंपावेळीच्या प्रसंगाची आठवण करुन देत सरकारला सल्ला दिला आहे.
"महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाहीतर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे. गावपातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विध्यार्थांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल," असं शरद पवार म्हणाले.
"दरम्यान, पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले, एवढेच नव्हे तर इतर नेते व दस्तुरखुद्द मा. प्रधानमंत्र्यांना देखील काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत अशी विनंती केली होती," असेही शरद पवारांनी म्हटलं.
"शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करुन योग्य मदतकार्य सुरु व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ व महसूल, कृषी, पाटबंधारे व इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे. मी राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती जवळून पाहिली आणि हाताळली आहे. अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे व कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होतं आणि अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वतःला झोकून देऊन काम करतात हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेनं अनेकदा सिद्ध केलेलं आहे. फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पिडीतांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो," असं शरद पवार म्हणाले.