“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:03 IST2025-06-25T21:01:46+5:302025-06-25T21:03:38+5:30
Sharad Pawar Reaction On Emergency: आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
Sharad Pawar Reaction On Emergency: देशातील आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा सर्व देशभरात या आणीबाणीला विरोध दर्शवत काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आणीबाणीविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणीबाणीवरून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणीबाणीवर मोठे विधान केले आहे.
कामगार संघटनेच्या एका मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी आणीबाणीवर भाष्य केले. वृत्तपत्रात काम करतात, त्यांना माहिती असेल. बाकीच्यांना माहिती नाही. जे वृत्तपत्र त्यांचे मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना सांगण्यात येते की, ही बातमी अशी छापू नका. सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायचीच असेल आणि नंतर काही झाले तर आमच्याकडे येऊ नका, अशी धमकी दिली जाते, असा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.
घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे
अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे. आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आणीबाणी होती. इंदिरा गांधी यांना दोष दिला. हे सर्व खरे आहे. पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधी यांनी देशाची क्षमा मागितली, ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. चित्र बदलले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.