"राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजिबात शक्यता नाही"; शरद पवारांचा उल्लेख करत पीयुष गोयल यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:32 IST2026-02-01T11:22:39+5:302026-02-01T11:32:40+5:30
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.

"राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजिबात शक्यता नाही"; शरद पवारांचा उल्लेख करत पीयुष गोयल यांचं विधान
Piyush Goyal on Merger of NCP Factions: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने केवळ महाराष्ट्राच्या राजकारणच हादरले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या हालचालींनाही मोठा ब्रेक लागला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर आता अनिश्चिततेचे सावट पसरले असून, यावर शरद पवार आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
"१२ फेब्रुवारीला होणार होती घोषणा"
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला. "अजितदादा आणि माझ्यात गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. जानेवारीच्या मध्यात विलीनीकरणाचा रोडमॅप तिम झाला होता आणि १२ फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा होणार होती," असा दावा पाटील यांनी केला आहे. दोन्ही गटांनी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचेही ठरवले होते.
"अजितची इच्छा पूर्ण करायची होती, पण..."; शरद पवार भावूक
बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मान्य केले की, ही चर्चा सकारात्मक दिशेने जात होती. "दोन्ही गट एकत्र यावेत ही अजितची मनापासून इच्छा होती. आता आमचीही तीच इच्छा आहे, पण या दुर्दैवी अपघातामुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेत खंड पडू शकतो," असं पवार म्हणाले.
पीयुष गोयल यांचे महत्त्वाचे विधान
दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी या विलीनीकरणाच्या शक्यतेवर थेट फुली मारली आहे. एका मुलाखतीत गोयल म्हणाले, "राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होईल असे मला वाटत नाही. अजित पवार यांनी महायुतीमध्ये उत्कृष्ट काम केले आहे आणि आता त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास आणि मतं दोन्ही गमावली आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात निमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही."
अजित पवार गटाची भूमिका
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विलीनीकरणावर बोलणे टाळले आहे. "सध्या आमचे प्राधान्य महायुती सरकारमध्ये स्थिरता राखणे हेच आहे," असे छगन भुजबल यांनी स्पष्ट केले. तटकरे यांनीही सध्या या विषयावर बोलण्यासारखे काही नाही असे सांगून मौन बाळगले आहे.