“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:04 IST2025-06-10T15:01:42+5:302025-06-10T15:04:48+5:30
Sharad Pawar News: कोण पक्षातून गेले, याची चिंता करू नका. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.

“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
Sharad Pawar News: राष्ट्रवादीत फूट पडेल, असे कधी वाटले नव्हते, कोण पक्षातून गेले, याची चिंता करू नका. सुरुवातीला आमची संख्या ६ होती, नंतर ती वाढली आणि ७२ वर गेली. जयंत पाटलांनी १० वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केले. सत्ता येते जाते, पण पुन्हा सत्तेत येणार हा विश्वास आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...
महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिले पाहिजे. हा पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम पक्षाने केले. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेच आ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणार असून, संधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात. येणाऱ्या निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्यावे, दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. राष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाही. देशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, जनतेचा पाठिंबा मिळाला, २६ वर्षांपूर्वी आपण एकत्र येऊन पक्ष स्थापन केला. २६ वर्षे लोकांनी सेवेची संधी दिली, अनेकांना पक्षाने संधी दिली. कार्यकर्त्यांमुळे हा दिवस साजरा करण्याची संधी मिळत आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.