सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:40 IST2025-06-02T19:40:03+5:302025-06-02T19:40:51+5:30
त्यांचे बोलणे बालिशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असा टोला त्यांनी लगावला.

सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
मुंबई - आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तांबे यांनी राहुल गांधी सहज कुणाला उपलब्ध होत नाही असं म्हटलं होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांना फटकारले आहे. पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते.
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्याचे ऋण ठेवावे. काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांचे बोलणे बालिशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असा टोला त्यांनी लगावला.
कृषिमंत्र्यांनी संवेदनशिलपणे बोलावे
तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याची गरज असते, आपण पालक आहोत अशी विधाने करून दुखवू नये, संवेदनशीलपणे वागले पाहिजे. कृषीमंत्री हे पद महत्वाचे आहे, मी स्वतः या विभागाचा मंत्री होतो, शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते पण कोकाटे यांनी ती ओसाड गावची पाटीलकी का वाटते हे माहित नाही. कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी आहे तर मग बागायती विभाग कोणता हे त्यांनी सांगावे, असा निशाणा त्यांनी साधला.
दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी भाजपा युतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडलेला दिसत आहे. काँग्रेस आघाडी सरकार व मविआ सरकार असताना शेतकऱ्याला सातत्याने मदत दिली. कर्जमाफी केली पण आत्ताचे सरकार कर्जमाफी वर बोलत नाही. शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
काय म्हणाले होते सत्यजित तांबे?
काँग्रेस हा देशातील विचार आहे, तो संपणार नाही. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. छातीठोकपणे सांगतो की, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधींची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला जाऊन दाखवावे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले होते.