Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 21:12 IST2025-06-05T21:10:44+5:302025-06-05T21:12:30+5:30
Samruddhi Mahamarg Latest Update: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.

Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
"आज आम्ही फक्त एक महामार्ग सुरू करत नाही आहोत, तर एक संपूर्ण आर्थिक क्रांतीला गती देणारा महामार्ग महाराष्ट्राच्या सेवेत समर्पित करत आहोत. हा महामार्ग केवळ रस्ता नसून, तो राज्याच्या प्रगतीचा ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ आहे", असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी काढले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचे (इगतपुरी ते आमणे, ठाणे – 76 किमी) तसेच सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीचे लोकार्पण केले.
या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांना थेट जेएनपीटी बंदराशी जोडतो. भविष्यात हा महामार्ग वाढवण बंदराशीही जोडला जाणार असून, यामुळे राज्याच्या लॉजिस्टिक नेटवर्कला जागतिक दर्जाचे बळ मिळणार आहे. समृद्धी महामार्गाचा वापर केवळ प्रवासासाठी न होता, तो राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा ठरेल."
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी लागलेल्या व्यापक यंत्रणेचेही विशेष कौतुक केले. "55,335 कोटींचा खर्च करून 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. या यशामागे एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, अभियंते, अधिकारी, कंत्राटदार, मशीन ओनर्स आणि दिवस-रात्र झटणारे हजारो मजूर यांचा मोलाचा वाटा आहे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शक्तिपीठ महामार्गाबद्दल फडणवीस काय बोलले?
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक घोषणा केली. "आता आम्ही शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करत आहोत. हा महामार्गही पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल असणार असून, तो मराठवाड्याच्या आर्थिक पुनर्जन्माला सुरुवात करणारा महामार्ग ठरेल. हा महामार्ग संपूर्ण भागात 'आर्थिक क्रांती' घडवणारा ठरणार आहे", असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "वाशी पुलावर निर्माण होणारी कोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे. तसेच, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे", अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्यातील सर्वात लांब बोगदा
समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
चार टप्पे, मोदींनी केले होते उद्घाटन
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, दुसऱ्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तिसऱ्या टप्प्याचे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते, तर अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज महायुती सरकारच्या सर्व प्रतिनिधींनी एकत्रितपणे केले.