“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:48 IST2025-06-27T21:48:03+5:302025-06-27T21:48:03+5:30

RSS Chief Mohan Bhagwat: सगळ्या विविधतेने नटलेल्या मुळाशी एकच तत्त्व आहे, तेच ओळखून संघ काम करतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

rss chief mohan bhagwat said about in one sentence what does the rashtriya swayamsevak sangh do and what is rss | “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

RSS Chief Mohan Bhagwat: कुटुंबात माणसाची घडण होते, माणसाचे जीवन घडते. कुटुंबात संस्काराची जी सामग्री मिळते, ज्या अनुशासनात तो वाढतो, त्याचा पुढे जीवनात खूप उपयोग असतो. त्यामुळे पूर्वजांचे स्मरण कृतज्ञतेने करायचेच असते. आजकाल केले जाते, ते सांगावे लागते. पूर्वा लोक करत होते. परंतु, आता कुणी केले तर ते उदाहरण होते. हा काळाचा महिमा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

RSSचे सरसंघचालक मोहन भागवत एका कार्यक्रमात बोलत होते. गेले दोन ते तीन दिवस मला सातत्याने दोन शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळत आहेत. पहिला म्हणजे करुणा आणि दुसरा शब्द आहे आपलेपणा. एका शब्दांत संघाचे वर्णन करायचे असेल, तर त्यासाठी आपलेपणा हा शब्द आहे. कारण संघ हिंदू संघटन करून काय करतो, हा आपलेपणा वाळत चाललेला आहे, त्याने पुन्हा ओलावा धरावा, हे करतो. कारण सगळे जग त्यावर चालले आहे. सगळ्या विविधतेने नटलेल्या मुळाशी एकच तत्त्व आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते एकच तत्त्व आहे हे ओळखून वागणे, म्हणजेच आपलेपणा आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे, त्याची आठवण संघ करून देतो

आपण एकाच तत्त्वाचे निरनिराळे आविष्कार आहोत. म्हणजे आपण सगळे एकमेकांचे आहोत. आपला योगायोगाने आलेले हे सानिध्य नाही. आपला संबंध आहे, अशी जाणीव ठेवून मनुष्य वागतो, तेव्हा तो मनुष्य म्हणवतो. पशुंमध्ये असे वागणे नसते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षाही चांगला होऊ शकतो. बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो. तो वाईट होत नाही, याचे कारण त्याला आपलेपणा जाणवतो. समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे, त्याची आठवण संघ करून देतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनाचे एक कर्तव्य आहे आणि आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचे हे दुसरे कर्तव्य आहे. आम्ही संघात असंच करतो, ही गोष्ट व्हायला पाहिजे. संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

 

Web Title: rss chief mohan bhagwat said about in one sentence what does the rashtriya swayamsevak sangh do and what is rss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.