Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:54 IST2025-06-27T11:51:54+5:302025-06-27T11:54:11+5:30
शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलै २०२५ रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठीप्रेमी सहभागी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत सूचक ट्वीट केले आहे.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव वादाचा विषय ठरला आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यापासून सर्वसामान्य मराठी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
रोहित पवारांचे ट्विट
"मराठी साठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस हा मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल", अशा शब्दात रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
मराठी साठी #दोन्ही_भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. #मराठी_माणूस#मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.#माय_मराठी |… pic.twitter.com/yjUpnAChiW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 27, 2025
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल."