शिक्षक भरतीसाठी सुधारित पद्धत लागू; प्रक्रियेत पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:57 IST2026-01-21T14:56:05+5:302026-01-21T14:57:47+5:30
जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार

शिक्षक भरतीसाठी सुधारित पद्धत लागू; प्रक्रियेत पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी सुधारणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केला असून, यामुळे जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार आहेत.
प्रत्येक उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या दोन प्रकरांपैकी केवळ एका प्रकारासाठीच्या शिफारशीसाठी ग्राह्य धरले जातील. सुधारित तरतुदींमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना नव्याने चाचणी परीक्षा देणे बंधनकारक राहील. शासनाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांनी पात्र गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर अर्ज करायचा आहे.
बदल काय केले?
स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त जागांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांना प्रवर्ग व विषयाचा विचार करून प्राधान्यक्रम देण्याची मुभा असेल. शैक्षणिक अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांसाठी प्राधान्यक्रम उपलब्ध असतील. मात्र, प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम ‘लॉक’ करता येतील.
सेमी-इंग्रजी शाळांतील शिक्षकांसाठी टीईटी
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पदभरती होणार आहे, त्या परीक्षेच्या अर्जाच्या शेवटच्या तारखेप्रमाणे उमेदवारांचे वय ग्राह्य धरले जाईल.
- तसेच १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार सेमी-इंग्रजी शाळांतील शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि टीईटी परीक्षा अनिवार्य राहील.
- पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या शैक्षणिक गटांसाठी शाळेचे माध्यम व त्यानुसार पात्रता विचारात घेतली जाईल.
- पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ नुसार म्हणजेच टेट संदर्भातील पदभरतीसाठी सुधारित तरतूद लागू असणार आहे.