वाचत-वाचत, ऐकत-ऐकत ‘इत्तर गोष्टी’, पुस्तकं सांगतात गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:44 IST2025-06-15T10:43:10+5:302025-06-15T10:44:07+5:30
या गोष्टी दीर्घ कथनपरतेची अपेक्षा करणाऱ्या आहेत.

वाचत-वाचत, ऐकत-ऐकत ‘इत्तर गोष्टी’, पुस्तकं सांगतात गोष्ट
एकनाथ पगार
मानवी जीवनातील मृत्यूची अटळता आणि निरंतरता, माणसांचे सामान्य जीवनव्यवहार, परंपरागत संस्कृतिदेखाव्याशी कर्मकांड म्हणून जोडून घेणं व नव्या पिढीने हे सारं नाकारणं, भाऊबंदकी- घरंदाजपणा आणि वर्तनातील विसंगती, ग्रामजीवनातले ताणेबाणे, छंद-फंद-स्वार्थीपणा आणि मृत्यूभयाने ताळ्यावर आल्यासारखं दाखवणं, लग्नसंस्था- कुटुंबसंस्था आणि कुचंबणा, फिल्मी लग्नसंस्था-कुटुंबसंस्था दुनियेतले दिखाऊ आभास त्यांची निष्प्रभता, तरुणांचे भरकटलेपण, बेरोजगारीतून बिनसलेलं तरुणांचं भावविश्व, मानवी संबंधांमधले कोतेपण अशी काही आशयसूत्रं प्रसाद कुमठेकर यांच्या ‘इत्तर गोष्टीं’मधून आविष्कृत झालेली आहेत.
इन्सलटेड सेल्स, 'क्ष'ची गोष्ट, हॅमरशिया या गोष्टींमधील वृत्तिगांभीर्य शोक-करुणाभाव-अस्वस्थता निर्माण करणारं आहे. या गोष्टी दीर्घ कथनपरतेची अपेक्षा करणाऱ्या आहेत. आडगावचे पांडे आणि आस्मानी सुल्तानी... या गोष्टीही दीर्घ कथनरूपांचीच अपेक्षा ठेवणाऱ्या आहेत. मुंबईत पूल कोसळून अनेकांना मरण मिळालं किंवा स्कायलॅब कोसळणार म्हणून भयग्रस्त होऊन 'खरं' जगून घेऊ म्हणून गोंधळ- उत्सव करणं अशा माहितीतल्या घटना वास्तवात घडून गेलेल्या आहेत. या परिचित घटनांच्या मुळाशी जात लेखकाने तत्त्वचिंतनपर कथनरूप निर्मिलं आहे. 'क्ष'च्या गोष्टीतलं पात्रच निवेदन करतं, सामान्य माणसाच्या मरणाच्या घटनासातत्यानं मानवजातीच्या प्रारंभापासून ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अधःपतनापर्यंतचं कथाविश्व येथे आहे.
येथील गोष्टींचे निवेदक बहुतकरून मराठवाडा - उदगिर भागातले आहेत. १९८० नंतरचं तरुणांचं भावविश्व, तरुणाईची स्वप्नं शहरातील नव्या बाजारू आणि फिल्मी स्वप्नाळू वास्तवाशी सांधेजोड करू पाहत आहेत असं वाटतं. विसाव्या शतकाची अखेर आणि एकविसाव्या शतकातील दिखाऊ प्रगती यांच्यातल्या घुसमट-कुसपटांशी या निवेदकांना / पात्रांना संघर्षही करावा लागत आहे. स्वीकारशील व्यक्तित्वे निरुपायाने या निवेदकांना/पात्रांना स्वीकारावी लागली आहेत, तरीही जात-धर्म-कुटुंब-संस्कार-भाऊबंदकी-नाती-समाज यांबद्दलच्या त्यांच्या भावना / आस्था क्षीण का होईना बंडखोरीच्या आहेत. पितृसंस्था-परंपरागत कर्मकांड-धर्मसमजुती यांबाबतीत या तरुण पिढीतील युवकांना विसंवादी प्रतिसाद द्यावेसे वाटतात, तसे ते देतातही ! चित्रपट-नट-नट्या, त्यांतील विवाहांचे छद्म-रंजनही काहींना आवडतं. वास्तवाच्या प्रखरतेला स्वप्नाळूपणे कुरवाळण्यासाठी चित्रपट-गीतं-दृश्य-किस्से यांचा आश्रयही काही कथांमध्ये आहे.
माणसांचं जगणं-वागणं, बोलणं-परंपराबद्ध असणं, परंपरा मोडू पाहणं, गंभीर राहणं, मरणं, हसणं अशा विविध परींचा संमिश्र कथानुभव येथे मिळतो. काही गोष्टी गंभीर भावावस्था निर्माण करतात तर काही गमतीदार माणसं, परिस्थिती यांची खिल्ली उडवतात. एका हुशार आणि गंभीर प्रकृतीच्या निवेदकाच्या कचाट्यात सापडल्याचा अनुभव मिळतो.
ऐकत राहावं, वाचत राहावं आणि मुख्य म्हणजे समाज, माणसं, परिस्थिती यांच्या विचारात पडावं असेही या गोष्टींचे अनुभव येतात, दरएक वाचनात पुन्हा पुन्हा काही जगणं-हसणं-स्थिरावणं जसं घडतच राहतं... गोष्टींचा कथनप्रवाह सुरूच असतो. भेटलेल्या, अनुभवलेल्या माणसांमध्ये लेखकाला गोष्टी दिसतात, दिसत राहतील. ऐकणं-वाचणंही त्यामुळे अप्रतिहत सुरू राहणार.