...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 09:28 IST2024-02-23T09:27:02+5:302024-02-23T09:28:00+5:30

उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

Raj Thackeray was earlier in politics, Uddhav Thackeray was doing photography - Smita Thackeray | ...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

मुंबई - Smita Thackeray Interview ( Marathi News ) कुटुंबात दुफळी नको व्हायला हवी होती. आजही बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होत असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे होऊ नयेत यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण काही गोष्टी खोलवर रुजलेल्या असतात. त्या सहसा निघत नाही. काहींचा असा उद्देश असतो की आम्हीच वारसदार आहोत. अशी वृत्ती कुणा एकाच्या मनात असेल तर कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसतात. या वृत्तीने कोण वागत असेल तर एकजूट कशी राहील? असं मत बाळासाहेब ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे यांनी केले आहे. 

स्मिता ठाकरे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते, सर्वात आधी राज ठाकरेच राजकारणात आले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेबांची काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याचं कौशल्य हे सर्व आत्मसात केले होते. राज ठाकरे राजकारणात पहिले आले. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. परंतु एक दिवस अचानक उद्धव ठाकरेंना वाटलं आपणही राजकारणात आले पाहिजे. कोणत्या उद्देशाने ते राजकारणात आले हे मला माहिती नाही. राजकारण हे समाजकारण असतं त्यामुळे ते चांगलेच होते. ते दोघे राजकारणात होते, मी नव्हते. उद्धव ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीमुळे काही गोष्टी विस्कळीत झाल्या. कोणाला कमी तर कोणाला जास्त मिळाले हे होत गेले असा खुलासा त्यांनी केला. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

तसेच  माँसाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांसाठी तो कठीण काळ होता. त्या काळात मी आणि माझी मुले त्यांच्यासोबत होतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये काय होते, ते कधीही कुणी बोलले नाही. मी सून आहे. या गोष्टी अंतर्गत होत्या. त्या कधीही पुढे आल्या नाहीत. यावर मी बोलणार नाही. कारण हे डर्टी पॉलिटिक्स आहे. माझ्यासाठी बाळासाहेब गुरु होते. आज मी जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. मी सतत लोकांच्या संपर्कात असायची. मी बाळासाहेबांकडे बघून शिकत होती. प्रत्येकाला साहेब भेटू शकत नव्हते तेव्हा साहेबांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगायचे. हळूहळू ते वाढत गेले. आम्हाला जे सांगितले ते करत होतो. आपल्याला संधी मिळाली आहे त्यातून लोकांच्या समस्या सोडवल्या जात असतील तर ते करण्यास काहीच हरकत नव्हती. त्याच उद्देशाने मी २५ वर्ष समाजसेवा करत राहिली असं स्मिता ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हा ते पाहून खूप वाईट वाटले. मी बाळासाहेबांसोबत बराच वेळ घालवला आहे. त्यांच्यासाठी सनातन जो आपला धर्म आहे तो खूप महत्त्वाचा असायचा. बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेने राजकारण केले. त्या विचारधारेपासून कुणी वेगळ्या मार्गाने जात असेल तर नक्कीच वाईट आहे. जर तुम्ही बाळासाहेबांना मानता, तर त्यांच्या विचारधारेने पुढे जायला हवे होते. महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेपासून वेगळी होती. उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. 

Web Title: Raj Thackeray was earlier in politics, Uddhav Thackeray was doing photography - Smita Thackeray