'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 15:00 IST2019-01-29T14:57:29+5:302019-01-29T15:00:08+5:30
कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली
मुंबई - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात आपल्या प्रभावी भाषणांनी कामगार चळवळीचा अंगार पेटवणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे दु:खी झालेला माईकसुद्धा आपल्या भावना रोखू शकलेला नाही, असे राज ठाकरे यांनी 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला असे शीर्षक देऊन प्रसिद्ध केलेल्या आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शविले आहे.
'सम्राट' कायमचा 'बंद' झाला . #GeorgeFernandespic.twitter.com/7JHJdRJfPn
— Raj Thackeray (@RajThackeray) January 29, 2019
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले. जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.