२५ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीपासून दूर राहा; राज्य सरकारने दिला इशारा, यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:23 IST2025-06-23T16:23:02+5:302025-06-23T16:23:38+5:30

राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

Rain Update: Stay away from Konkan coast till June 25; State government warns, systems alerted | २५ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीपासून दूर राहा; राज्य सरकारने दिला इशारा, यंत्रणा अलर्ट

२५ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीपासून दूर राहा; राज्य सरकारने दिला इशारा, यंत्रणा अलर्ट

मुंबई - कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५.३० वाजल्यापासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.  लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४,  रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३  आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १४.३, रायगड १०.७, रत्नागिरी २५.८,  सिंधुदुर्ग ३६.४, पालघर ७३.३, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१,  सातारा ४.७,  सांगली २.८,  कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्ड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

जोरदार पावसाची शक्यता

येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसहविदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी तशी स्थितीही तयार झाली. मोठ्या फरकाने तापमान घसरून वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जूनपासून पुढील पाच दिवस, म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

Web Title: Rain Update: Stay away from Konkan coast till June 25; State government warns, systems alerted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस