MSRTC: एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 08:12 IST2026-02-07T08:12:11+5:302026-02-07T08:12:56+5:30
Pratap Sarnaik on MSRTC: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्न वाढू शकते. यासाठी वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.

MSRTC: एसटीचा वक्तशीरपणा वाढवा, तरच उत्पन्न वाढेल; परिवहन मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेवर धावल्या तरच उत्पन्न वाढू शकते. यासाठी वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उत्पन्नवाढीसोबत खर्चावरही नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
एसटी महामंडळाच्या सुमारे १७ आगारांना दैनंदिन अपेक्षित उत्पन्न गाठण्यात अडचणी येत आहेत. परिणामी एसटी महामंडळाचे उत्पन्न आणि खर्च यामधील फरक जानेवारी महिन्यात १२० कोटी होता. याबाबत ‘लोकमत’ने ६ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी उत्पन्नवाढीसाठी आगार पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्तीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. दैनंदिन प्रवासात बस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे अशा तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडतो.
शासनाच्या विविध सवलतींमुळे एसटी ही सर्वसामान्यांना परवडणारी असल्याने प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही.
प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे. यासाठी आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल, याची खात्री करावी, असे आदेश सरनाईक यांनी दिले.
प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल ठरत असून वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला आहे. वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री