"बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता, हा आमचा प्राधान्यक्रम" दादा भुसे यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:26 IST2025-02-18T12:24:48+5:302025-02-18T12:26:55+5:30
Dada Bhuse News: बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये प्रभावी उपाययोजना राबविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकार शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असून, शिक्षण क्षेत्रातील काही समित्या पुनर्रचित करण्यात येणार आहेत.

"बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता, हा आमचा प्राधान्यक्रम" दादा भुसे यांचं विधान
मुंबई - महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित 'बालरक्षा अभियान'चा उद्घाटन सोहळा सोमवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, "बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये प्रभावी उपाययोजना राबविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकार शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी कटिबद्ध असून, शिक्षण क्षेत्रातील काही समित्या पुनर्रचित करण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सुरक्षिततेसाठी आवश्यकतेनुसार दामिनी पथक व पोलीस बंदोबस्त ठेवण्याचाही विचार आहे."
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सायबर सुरक्षेच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, "आजच्या डिजिटल युगात बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्या वेबसाईट्सवर प्रवेश असावा यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच, ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टमच्या माध्यमातून शाळा आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे."
या अभियानाच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, शाळांमध्ये योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाच्या मदतीने बालहक्क संरक्षणाच्या उपाययोजना राबविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.