"पटेल, तटकरे हे त्यांचे पक्षाचे नेते, त्यांनी काही ठरवलं असेल तर..."; शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:33 IST2026-01-31T10:32:47+5:302026-01-31T10:33:19+5:30
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी यासाठी गेली ४ महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. सर्व चर्चा या दोघांनी केली असं शरद पवारांनी सांगितले.

"पटेल, तटकरे हे त्यांचे पक्षाचे नेते, त्यांनी काही ठरवलं असेल तर..."; शरद पवार स्पष्टच बोलले
बारामती - अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महिला विराजमान होणार आहे. गुरुवारी अजित पवारांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत परतले. या नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आले. आज शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार असून त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडेल. या सर्व घडामोडी इतक्या वेगाने घडत असल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यात शपथविधीबाबत मला काही कल्पना नाही असं सांगत शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.
अजित पवारांना जाऊन ७२ तास झाले नाही तोवर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई केली जातेय का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला होता. त्यावर बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याची चर्चा इथं झाली नाही. ती चर्चा मुंबईत झाली. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हा त्यांचा अधिकार आहे. प्राधान्याने काय केले पाहिजे हे त्यांनी ठरवलेले दिसते. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर मी फार भाष्य करणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी यासाठी गेली ४ महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचं नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. दुर्दैवाने या अपघातामुळे यात खंड पडला. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता. पण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेतले असतील असा खुलासाही शरद पवारांनी केला.
दरम्यान, जे गेले आहेत त्यांना परत आणले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत असेल तर आम्हाला आत्मविश्वास मिळू शकतो. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.