दिग्दर्शक रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण; "आंतरराष्ट्रीय गँगविरुद्ध कठोर कारवाई" - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:50 IST2026-03-19T10:50:33+5:302026-03-19T10:50:57+5:30
आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

दिग्दर्शक रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण; "आंतरराष्ट्रीय गँगविरुद्ध कठोर कारवाई" - देवेंद्र फडणवीस
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. तर, रोहित शेट्टीला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणी बिष्णोई गँगचा ऑपरेटर शुभम लोणकरच्या भावालाही अटक केली असून, परदेशात पळून गेलेल्या शुभमचा कसून शोध घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय गँगविरोधातील कारवाई तीव्र गतीने सुरू असून, कुठल्याही परिस्थितीत मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
उद्धवसेनेचे आ. मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर समाधानकारक आहे. स्वतः दोनदा शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली असे नमूद केले. आ. सचिन अहिर यांनी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मुंबईकर, विशेषतः सिने कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय गँगविरोधात ठोस उपाययोजनांची मागणी केली.
शुभम परदेशातून फोनद्वारे करतोय कारवाया...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, एका इसमाने भिंतीलगत पिस्तूल चालवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या स्कुटीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना अटक केली.
या तपासातून मुंबई पोलिसांचे प्रोफेशनॅलिझम अधोरेखित झाले. शुभम हा परदेशातून फोनद्वारे कारवाया करत आहे. काँग्रेस व भाजप आमदारांनाही त्याने धमकीचे फोन केले. पण, त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाही.
...म्हणून सेलिब्रेटींना पोलिस संरक्षण
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या अनमोल बिष्णोईची कस्टडी मुंबई पोलिसांना देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. एनआयए कायद्यानुसार आरोपीला पोलिस कोठडी मिळत असल्याने त्यांच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.
धमकीचे कॉल आल्यावर सेलिब्रेटी अधिक घाबरतात त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण दिले जाते. मात्र, मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई ही राज्याची राजधानी असली तरी देशाचीही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईला कसल्याही परिस्थितीत गँगवॉरकडे जाऊ देणार नाही, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे अशा पद्धतीची रॅकेट समूळ नष्ट केली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.