पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; नेत्यांच्या आयातीवर सुधीर मुनगंटीवारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 05:22 IST2020-06-03T05:22:16+5:302020-06-03T05:22:39+5:30

कोरोनाच्या महामारीच्या काळात मलाईदार खाती हा प्रकार आता बंद केला पाहिजे.

The party also has to be self-reliant : Sudhir Mungativar | पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; नेत्यांच्या आयातीवर सुधीर मुनगंटीवारांचे मत

पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; नेत्यांच्या आयातीवर सुधीर मुनगंटीवारांचे मत

- अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आवश्यकता असेल तेथे नेते आयात करण्यात गैर काहीच नाही, मात्र आत्मनिर्भर भारतासोबत आत्मनिर्भर पक्ष बनवावा लागेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


लोकमत यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता अशा अनेक नेत्यांना पक्षाने बाजूला ठेवले याविषयी आपली भूमिका काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ज्यांच्या कष्टावर, श्रमावर पक्ष मोठा झाला. वाढला आणि ज्यांनी अनेक वर्ष पक्ष विस्तारासाठी काम केले, त्यांना जो पक्ष विसरून जातो, त्या पक्षाला भविष्यात अस्तित्वासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जुन्या लोकांना विसरून चालत नाही. आम्ही त्याची काळजी घेतो घेत आहोत. भविष्यातही नव्याने पक्षात येणाऱ्या लोकांना कार्यक्षमतेनुसार संधी देण्यात गैर नाही. मात्र जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचा विसर पक्षाने पडू देऊ नये. असे झाले तर पुढचे पाठ, मागचे सपाट होईल..! राजकारणात हे होऊ नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भविष्यात हीच भूमिका घेतील असेही मुनगंटीवार म्हणाले.


कोरोनाच्या महामारीच्या काळात मलाईदार खाती हा प्रकार आता बंद केला पाहिजे. भविष्यात मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आणि कृषी यासारखी खाती स्वत:कडे ठेवली पाहिजेत. त्यामुळे गरजेप्रमाणे निधी उपलब्ध होईल, तसेच सुरळीत कारभार चालण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: The party also has to be self-reliant : Sudhir Mungativar