“...तर नाईलाजाने जूनमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल”; मनोज जरांगे, आता कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:27 IST2026-02-25T18:27:11+5:302026-02-25T18:27:11+5:30
Manoj Jarange Patil: मराठा समाज भाजपापासून दूर जाऊ द्यायचे नसेल, तर मागण्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा २०२९ मधील निवडणुकीत परिणाम दिसतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

“...तर नाईलाजाने जूनमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल”; मनोज जरांगे, आता कारण काय?
Manoj Jarange Patil:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला भाजपापासून दूर जाऊ द्यायचे नसेल तर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा २०२९ मधील निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील. सातारा संस्थानच्या गॅझेटीयर संदर्भात शासन निर्णय कधी काढणार, तसेच, अधिकाऱ्यांकडून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याची तक्रार करत, सरकारने स्पष्ट परिपत्रक काढावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्यावर समाजाने विश्वास टाकला आहे. विखे पाटलांनी जीआर काढला की मराठवाड्यातला मराठा १०० टक्के आरक्षणात जाणार, मग हा जो विश्वास टाकला त्या विश्वासाचा गैरविश्वास विखे यांनी होऊ देऊ नये. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडीटी दिल्या जात नाही. स्थानिक चौकशी अहवालानुसार जर चौकशी केली असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विखे पाटील यांनी समाजाचा विश्वास टिकवावा
गोरगरीब मराठ्यांच्या अस्तित्वाशी खेळण्याचे काम सरकार करत आहे. पुढच्या काळात सरकारने हे करू नये. नाहीतर मला नाईलाजाने जून महिन्यात पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जून महिन्यात विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होतात, त्यांचे प्रवेश जर रद्द झाले तर मी ऐकणार नाही, एकाही मंत्र्याचे ऐकूनही घेणार नाही. हे राधाकृष्ण विखे यांनी लक्षात घ्यावे. विखे पाटील यांनी समाजाचा विश्वास टिकवावा आणि आपली प्रतिमा खराब होऊ देऊ नये, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
दरम्यान, सरकारने द्यायचे तर हे आधीच करायला पाहिजे होते, इतक्या दिवस विनाकारण समाजाचा छळ का करायचा? गोरगरिबांच्या प्रवेशाचा प्रश्न असतो शिक्षणाचा प्रश्न असतो. फडणवीस यांनी मोठ्या मनाने हा जीआर काढला, त्याला शिंदेंचा सपोर्ट आहे मग अडवणूक का करायची? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.