मुंबई-पुणे महामार्गाला पर्यायी नवीन मार्ग बनणार; कॅबिनेटच्या पायाभूत सुविधा समितीची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:17 IST2026-03-20T13:15:56+5:302026-03-20T13:17:11+5:30
या नव्या महामार्गामुळे नवी मुंबई, कर्जत आणि पुणे यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी तयार होईल. यामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासाला चालना मिळेल.

मुंबई-पुणे महामार्गाला पर्यायी नवीन मार्ग बनणार; कॅबिनेटच्या पायाभूत सुविधा समितीची मंजुरी
मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बऱ्याचदा हा प्रवास नकोसा वाटतो. मागील काळात या महामार्गावर एक गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाली. याचा नाहक फटका वाहन चालकांना बसला. मुंबई-पुणे येण्यासाठी एक्सप्रेस मार्गाचा अधिक वापर केला जातो. परंतु आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन महामार्ग बनवण्याची तयारी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथून हा महामार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे जोडला जाईल. राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहनांना हा सोयीस्कर महामार्ग असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन नेरळ -शिरूर या महामार्गासह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना समितीची तत्वत: मंजुरी देण्यात आली. या नियोजित महामार्गासाठी आवश्यक मान्यता व निधी तरतुदी बाबत कार्यवाही केली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना दिले.
या महामार्गावर वाढणारी वाहतूक आणि भविष्यात वाहनांची संख्या लक्षात घेता पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चाही बैठकीत करण्यात आली. तसेच अलिबाग- विरार महामार्गाच्या अटल सेतू , मुंबई गोवा महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग जोडणारे विविध नोड व पुणे–शिरूर सहा पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाबाबत भूसंपादन, मंजुरी प्रक्रिया, निधी तरतुदी याबाबत चर्चा करण्यात आली.
कसा असेल नवीन महामार्ग?
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी नेरळ-शिरूर असा चार पदरी रस्ता बनवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १२०० कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. या नव्या महामार्गामुळे नवी मुंबई, कर्जत आणि पुणे यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी तयार होईल. यामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासाला चालना मिळेल. विशेषत: मालवाहतुकीसाठी हा नवा कॉरिडॉर उपयोगी ठरेल. सध्या नेरळ ते पुणे शिरूर या प्रवासासाठी तीन ते साडे तीन तास लागतात. या नव्या महामार्गामुळे कमी कालावधी लागू शकतो. मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. कर्जत, शिरूर, पुणे परिसरात नवीन इंडस्ट्रीयल झोन वाढतील.