“संपूर्ण देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे सरकार मान्य का करत नाही?”; सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:46 IST2026-03-16T11:45:46+5:302026-03-16T11:46:32+5:30
NCP SP Group Supriya Sule News: राहुल गांधींनी तुटवड्याबाबत मांडलेले मुद्दे आता खरे होताना दिसत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“संपूर्ण देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे सरकार मान्य का करत नाही?”; सुप्रिया सुळेंचा सवाल
NCP SP Group Supriya Sule News: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 'पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस' (पीएनजी) कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना अनुदानित एलपीजी सिलिंडर ठेवण्यास किंवा नव्याने खरेदी करण्यास बंदी घातली आहे. गॅस पुरवठ्यावर आलेला ताण कमी करण्यासाठी पीएनजीच्या विस्ताराला गती देण्याचे निर्देश नियामक संस्थांना केंद्र सरकारने दिले आहेत. सरकारकडून अफवांना बळी पडण्याचे आवाहन केले जात असेल तरी विरोधक मात्र सरकारने जनतेला सत्य सांगावे. गॅसचा तुडवडा असल्याचे मान्य करावे, असे म्हणत निशाणा साधला आहे.
गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मान्य का करत नाही? ही वेळ राजकारण करण्याची नाही, आरोप करण्याची नाही. यावर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा. केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. जनतेला जे वास्तव आहे ते सांगितले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
पुणे, बारामतीत लघुउद्योग बंद झाले आहेत
शनिवार आणि रविवारी पुण्यात होते. बारामतीत जाऊनही आढावा घेतला. सगळीकडे प्रचंड अडचणी आहेत. एक ग्रुप आहे ते धायरीत पोळ्या करतात. हिंजवडीत काही कंपन्या आहेत, त्यांना पोळ्या पाठवत असतात. तिथे ५० टक्के काम बंद झाले. कारण गॅसचा तुटवडा आहे. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. व्यावसायिक गॅस मिळत नाही. रेस्तराँ बंद झाले आहेत, लघुउद्योग बंद झाले आहेत. दौंड, इंदापूर या भागांमध्ये गॅस तुटवड्यामुळे ७५ टक्के कामगार कमी केले आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
तुटवडा आहे तर कृती आराखडा का आखला जात नाही?
तुटवडा आहे तर कृती आराखडा का आखला जात नाही? जिल्हाधिकारीही तेच बोलत आहेत, जे त्यांना सांगितले आहे. भारतात एलपीजीची सगळी यंत्रणा कोसळली आहे. संसदेत आम्ही या विषयावर चर्चा मागत आहोत. आत्ताची वेळ ही कुठलाही विरोध करण्याची नाही ही या समस्येतून मार्ग काढण्याची वेळ आहे. मी कुणावर आरोपच करत नाही. बारामती, जळगाव, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडे तुटवड्याची स्थिती आहे. महाराष्ट्र आणि भारत सरकार कशाची वाट बघते आहे? का सांगत नाही की देशात तुटवडा आहे? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, लघू उद्योग, खानावळी, महिला भगिनी ज्या घरातून काही व्यवसाय करतात तिथे अडचणी येत आहेत. रांगा लावून पुरुषांना किंवा महिलांना गॅस आणावा लागतो आहे. कष्टकरी महिलांना सिलिंडर मिळत नाही. अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी स्थिती आहे. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. कारण हा विषय राजकीय विषय राहिलेला नाही. देशातील लोकांना वास्तव काय ते सांगितले पाहिजे. कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागू शकतो. राहुल गांधी यांनी तुटवड्याबाबत जे मुद्दे मांडले ते आता दोन आठवड्यांनी खरे होताना दिसत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.