राजकीय घडामोडींना वेग, जयंत पाटील यांचे CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:21 IST2025-02-28T16:19:27+5:302025-02-28T16:21:06+5:30
NCP SP Group Leader Jayant Patil Letter To CM Devendra Fadnavis: अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

राजकीय घडामोडींना वेग, जयंत पाटील यांचे CM देवेंद्र फडणवीसांना पत्र; नेमके कारण काय?
NCP SP Group Leader Jayant Patil Letter To CM Devendra Fadnavis: राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. बीड, परभणी प्रकरण विरोधकांनी लावून धरले आहे. यातच पुण्यातील प्रकरणावरून विरोधक आणखी आक्रमक झाले आहे. अशातच राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. यातच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.
वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय, असा प्रश्न उद्भवला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल
महाराष्ट्र शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि. (Rosmerta Safety systems LTD), रीअर मेझॉन इंडिया लि. (Real Mazon India LtD) आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. (FTA HSRP solutions Pvt. LtD.) या खासगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. उदा. गुजरातमध्ये दुचाकीसाठी १६० रुपये आहेत तर महाराष्ट्रात ४५०, गोव्यात चारचाकीसाठी २०३ रुपये आहेत तर महाराष्ट्रात ७४५ अशी बरीच तफावत दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे तर या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट दिले याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाकडे केली आहे.