Union Budget 2022: “या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही”: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:49 IST2022-02-01T15:47:19+5:302022-02-01T15:49:15+5:30
Union Budget 2022: सरकारी संपत्ती विकून देश चालवायचा हा मोदींचा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे या अर्थसंकल्पावरून दिसते, असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे.

Union Budget 2022: “या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही”: नवाब मलिक
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. तब्बल दीड तास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. त्यानंतर आता अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही, अशी टीका केली आहे.
महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल, अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाला होती मात्र या अर्थसंकल्पातून तसे दिसले नाही. तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही. या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या घोषणा जास्त करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत असते. परंतु हा अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावर सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
मोदींची ती जुमलेबाजी होती का?
नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, आजच्या अर्थसंकल्पात तीन वर्षात ६० लाख लोकांना रोजगार देण्याचे सांगण्यात आले म्हणजे मोदींची ती जुमलेबाजी होती का? २०२२ पर्यंत प्रत्येक माणसाचा हक्काचा कर देशात होईल असेही मोदी म्हणाले होते म्हणजे ती पण जुमलेबाजी होती का? असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
संपत्ती विकून देश चालवायचा मोदींचा कार्यक्रम सुरुच राहणार
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन देण्यात आले होते आणि आता शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करु सांगत आहेत. देशातील सर्वांत विश्वासार्हता असलेली कंपनी एलआयसी असून तिचा आयपीओ काढून विकण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे म्हणजे संपत्ती विकून देश चालवायचा हा मोदींचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे, असा टोला लगावत, एकंदरीत या अर्थसंकल्पातून कुठल्याच वर्गाला दिलासा देता आला नसल्याने जनतेमध्ये निराशा आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोदी सरकारचे बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवे असते. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसते. यंदाचे बजेटही तसेच आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरिबांचा किती गळा किती आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते, येत्या काळात पाहू, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.