Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 21:16 IST2022-09-16T21:14:27+5:302022-09-16T21:16:53+5:30
गरीब मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचे पाप एकनाथ शिंदेंनी केलेय, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”
Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून अद्यापही महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून शिंदे-भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतके स्वार्थी आहेत की, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दीड ते दोन लाख युवकांना बेरोजगार केले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
अडीच महिने झाले राज्यभरात पालकमंत्र्यांची नियुक्ती नाही. पुणे जिल्ह्यात जवळपास ८०० कोटी रुपयांची गोरगरीब जनतेच्या विकासकामांचे पैसे थांबविले आहेत. हे कशासाठी तर हे फक्त मला करायचे यासाठी. हे सर्व पैसे राज्यातील गरीब जनतेचे आहेत. राज्यातील इतर सर्व कामेही अशाचप्रकारे थांबली आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
गरीब मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचे पाप एकनाथ शिंदेंनी केलेय
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतके स्वार्थी आहेत की, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दीड ते दोन लाख युवकांना बेरोजगार केले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. स्वतःला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायचे आणि या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचं पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू. पण नवीन सरकार येऊनही अजून पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. लहानसहान कामांसाठीच पालकमंत्री असतात. ती करण्यासाठी नागरिक दरवेळी मुंबईला जाणार का, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, शरद पवार साहेब बोलले ते बरोबर आहे. महाराष्ट्राची लहान मुलाप्रमाणे समजूत काढण्याचे काम सुरु आहे. ही बाब दुर्दैवी आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे.वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुणे जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.