Sharad Pawar : ... पण त्यांनी विक्रम केला हे मान्य करायला हवं; अनिल देशमुखांच्या घरावरील छाप्यांवरून पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:33 IST2021-10-13T15:33:23+5:302021-10-13T15:33:58+5:30
Sharad Pawar On Anil Deshmukh House Raid : अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं पाचव्यादा छापा टाकला. कथित १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सध्या तपास आहे सुरू.

Sharad Pawar : ... पण त्यांनी विक्रम केला हे मान्य करायला हवं; अनिल देशमुखांच्या घरावरील छाप्यांवरून पवारांचा टोला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोप केले होते. कथिर शंभर कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणी सध्या सीबीआयकडून (CBI) तपास सुरू आहे. तपासादरम्यान सीबीआयनं पाच वेळा देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवा यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
"काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्यानं केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांसारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. परंतु ज्यांनी ते आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करतो असं चित्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं," असं पवार यावेळी म्हणाले. अनिल देशमुख यांच्या घरी आता पाचव्यांदा छापा टाकण्यात आला असून पाच वेळा छापा हा सीबीआयचा विक्रम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अनिल देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकण्यात आला. या एजन्सीचं मला कौतुक वाटतं. परंतु एकाच घरात पाच वेळा चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनं करावा असंही ते म्हणाले.
लखीमपूरसारखी घटना यापूर्वी घडली नाही
"लाखीमपूर खेरी याठिकाणी जो हिंसाचार झाला तो पूर्वी कधी झाला नव्हता. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा होता ही गोष्ट आधी नाकारली गेली. परंतु न्यायालयानं दखल घेतल्यानंतर त्याला अटक करावी लागली. यात सत्ताधारी पक्ष भाजपनं भूमिका घ्यायला हवी होती. परंतु त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली गेली. शेतकऱ्यांची हत्या झाली आहे, त्या घटनेत एक पत्रकार सुद्दा मृत्यू पावले आहेत हे मला एका वृत्तपत्रातून समजलं आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
लखीमपूरच्या मुद्द्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळमध्ये काय घडलं असं विचारलं. त्यांनी जे काही विचारलं ते बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले. परंतु त्यांच्या मृत्यूला नेते जबाबदार नव्हते. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही पाऊल उचललं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मावळमधल्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतरप लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं.