नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:31 IST2019-02-11T00:31:35+5:302019-02-11T00:31:45+5:30
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे.

नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी
कोल्हापूर : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
उटगी म्हणाले, नोटाबंदीने उद्ध्वस्त झालाच; पण त्याबरोबर उद्योग व्यवसायांना घरघर लागली. त्यातून अजूनही देश सावरलेला नाही, गेल्या तीन वर्षांत मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीचा आकड्यांचा विक्रम मोडला आहे. चलनातून रद्द केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा चलन व्यवस्थेत ८६.४४ टक्के हिस्सा होता. सरकारच्या आदेशाप्रमाणे विहीत वेळेत ९९.३० टक्के जुने चलन परत आल्याचे केंद्र सरकार सांगते; पण देशातील जिल्हा मध्यवर्ती बॅँकांकडील ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्याच नाहीत. नेपाळ, भूतान या देशांतील भारतीय चलन तसेच असताना सरकार कोणते आकडे देशासमोर ठेवत आहे, असा सवाल उटगी यांनी केला.
रिझर्व्ह बॅँकेने २०१५ ते २०१८ या चार वर्षांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये एकूण चलनाची प्रत्यक्ष आकडेवारी दिली आहे. ५०० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या; पण त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे रिझर्व्ह बॅँकच सांगते. मग या नोटा कोणाच्या परवानगीने छापल्या याचे उत्तर रिझर्व्ह बॅँकेने देशातील जनतेला दिले पाहिजे, असे आव्हान विश्वास उटगी यांनी दिले.
रिझर्व्ह बॅँकेने दीड लाख
कोटीच्या जादा चलनाबद्दल खुलासा करावा, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केली आहे. संसदेचे शेवटचे अधिवेशन सुरू आहे, यामध्ये संयुक्त संसदीय समिती स्थापन करून जादा चलनाची चौकशी करावी, अन्यथा येत्या आठवडाभरात न्यायालयीन लढाई सुरू केली
जाईल, असा इशारा त्यांनी
दिला.
‘जीडीपी’ची सर्वाधिक घसरण
केंद्र सरकार ‘जीडीपी’च्या आकडेवारीमध्ये गडबड करत आहे. पावणेदोन टक्के इतकी प्रचंड घसरण जीडीपीमध्ये झाली असून, हे अच्छे दिनाचे द्योतक म्हणायचे काय? असा सवालही उटगी यांनी केला.