मुंब्रा दुर्घटना नेमकी घडली कशी? रेल्वेची चौकशी समिती घेणार कारणांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:14 IST2025-06-11T12:13:27+5:302025-06-11T12:14:00+5:30
Mumbra Train Accident: मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांचा समावेश आहे.

मुंब्रा दुर्घटना नेमकी घडली कशी? रेल्वेची चौकशी समिती घेणार कारणांचा शोध
मुंबई - मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेचे नेमके कारण हे शोधण्याबरोबरच तिची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ही पाच सदस्यीय समिती उपाययोजना सुचविणार आहे. ही समिती रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या निगराणीत काम करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याची माहिती रेल्वे देऊ शकत नाही. ते एक कोडेच आहे.
नेमक्या कोणत्या ट्रेनमधून प्रवासी पडले?
मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी वेगाने येणाऱ्या दोन लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. ही घटना सकाळी ८:५८ वाजता कल्याण दिशेकडील एका तीव्र वळणावर घडली. मुंब्राजवळ सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून आठ प्रवासी पडले. त्यानंतर काही वेळातच, चेन खेचल्यामुळे ठाणे स्थानकावर तीच ट्रेन थांबली तेव्हा आणखी पाच प्रवासी जखमी अवस्थेत आढळले. त्यामुळे नेमके काय झाले, याचा शोध रेल्वेची चौकशी समिती घेणार आहे.
चौकशीसाठी मुद्दे...
ही दुर्घटना कशी घडली? प्रवाशांमध्ये काही भांडणे झाली होती का? दोन ट्रेनमधील प्रवासी वळणावर एकमेकांवर घासले गेले का? प्रवासी लटकत होते. त्यामुळे बॅग घासून ते पडले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न समिती करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंब्र्यातील दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. दुर्घटनेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संभाव्य अपघात टाळण्याच्या उपाययोजनांवरही विचार करण्यात येणार आहे. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
- डॉ. स्वप्निल नीला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे