Maratha Kranti Morcha: मुंबई-गोवा महामार्ग केला बंद, मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:20 IST2018-07-24T14:19:40+5:302018-07-24T14:20:52+5:30
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाचा बळी गेल्याने या विरोधात खारेपाटण मराठा समाजाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्ग बंद करून निषेध करण्यात आला.

Maratha Kranti Morcha: मुंबई-गोवा महामार्ग केला बंद, मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक
सिंधुदुर्ग : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाचा बळी गेल्याने या विरोधात खारेपाटण मराठा समाजाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्ग बंद करून निषेध करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून सातारा, पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली आहे.