परीक्षा होऊन दोन वर्षे उलटली, तरी निकाल लागेना, अंतिम निकाल जाहीर करण्याची उमेदवारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 22:21 IST2026-03-09T22:21:39+5:302026-03-09T22:21:57+5:30
MPSC Exam News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबविण्यात येत असलेल्या राज्यसेवा २०२४ भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

परीक्षा होऊन दोन वर्षे उलटली, तरी निकाल लागेना, अंतिम निकाल जाहीर करण्याची उमेदवारांची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबविण्यात येत असलेल्या राज्यसेवा २०२४ भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. उमेदवारांनी आयोगाकडे निवेदन देत अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
या भरती प्रक्रियेची जाहिरात २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२३ रोजी पूर्वपरीक्षा, १२ मार्च २०२५ रोजी पूर्वपरीक्षेचा निकाल, तर २७ ते २९ मे २०२५ दरम्यान मुख्य परीक्षा पार पडली. मुख्य परीक्षेचा निकाल ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि ५ जानेवारी २०२६ रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
दरम्यान, ऑप्टिंग आऊट आणि अपील मेडिकल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, अशी उमेदवारांची तक्रार आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली असून त्याचा उमेदवारांवर मानसिक आणि आर्थिक परिणाम होत असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.
अनेक उमेदवार अल्पभूधारक, अल्प उत्पन्न किंवा सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून येत असल्याने हा विलंब त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रशिक्षण आणि पुढील नियुक्त्या रखडल्याने शासनातील रिक्त पदांचा प्रश्नही अधिक गंभीर होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल आणि अंतिम गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर करून निवड उमेदवारांची शिफारस सामान्य प्रशासन विभागाकडे करावी, अशी मागणी उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.