मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:58 IST2025-06-25T12:57:29+5:302025-06-25T12:58:06+5:30
आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षातील कार्यकर्तेही आग्रही असल्याचे दिसून येते. त्यातच आज उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची एकत्रित पत्रकार परिषद आज होत आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धवसेना-मनसे एकत्रित आल्याचे चित्र राज्याला पाहायला मिळणार आहे.
आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच मी करेन असं सांगत युतीच्या चर्चांना सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर आज मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सच्या अंतर्गत अजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि प्रशासनाविरोधात हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे सांगण्यात येते. आज एकत्रित पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्ष कामगारांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हीच राज-उद्धव युतीचे पहिले पाऊल आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
"दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल"
इतिहासाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी पेलली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. आज मराठी माणसाचे रक्षण केले नाही तर मराठी माणूस शंभर वर्षे मागे ढकलला जाईल. याची जबाबदारी कोणावर असेल. मराठीची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून आम्हाला विरोधात उभारले पाहिजे. हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाही तर मराठी माणूस हताश होईल असं मोठं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतेच केले होते.
त्याशिवाय संजय राऊत यांनी वरिष्ठांसारखे वागले पाहिजेत. जसं आमच्या पक्षाकडून बाळा नांदगावकर दोन वेळा त्यांच्याकडे गेले. बाळा नांदगावकरांनी मातोश्रीवर जाणे म्हणजे प्रत्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाण्यासारखं आहे असं आम्ही मानतो, मग असे काही प्रयत्न तुमच्याकडून झाले आहेत का? तुमच्याकडून कोण राज ठाकरेंकडे गेलं आहे का? तुम्ही कधी प्रस्ताव ठेवला आहे का? माध्यमात काय सुरू आहे, सर्वसामान्य जनता व्यथित आहे असंही महाजनांनी संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर उत्तर दिले आहे.